वेदाबेस​

श्लोक 6 . 1

श्रीभगवानुवाच
अनाश्रित: कर्मफलं कार्यं कर्म करोति य: ।
स सन्न्यासी च योगी च न निरग्न‍िर्न चाक्रिय: ॥ १ ॥
-

शब्दार्थ

श्री-भगवान्-उवाच-श्रीभगवान म्हणाले; अनाश्रित:-आश्रय न घेता; कर्म-फलम्- कर्मफलांचा; कार्यम्-कर्तव्य; कर्म-कर्म; करोति-करतो; य:-जो; स:-तो; सन्न्यासी-संन्यासी; च-सुद्धा; योगी-योगी; च-सुद्धा; न-नाही; नि:-रहित; अग्नि:-अग्नी; न-तसेच; च-सुद्धा; अक्रिय:-कर्तव्यहीन.

भाषांतर

श्रीभगवान म्हणाले: जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय, पण जो अग्निहोत्रादिक कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासीही नाही किंवा योगीसुद्धा नाही.

तात्पर्य

या अध्यायात भगवंतांनी, मन आणि इंद्रिय संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांगयोग पद्धतीचे वर्णन केले आहे. तरीही सामान्य लोकांना, विशेषत: वर्तमान कलियुगामध्ये या पद्धतीचे आचरण करणे अतिशय कठीण आहे. जरी या अध्यायात अष्टांगयोग पद्धतीची शिफारस करण्यात आली असली तरी भगवंत विशेष जोर देऊन सांगतात की, कर्मयोग अथवा कृष्णभावनाभावित कर्म करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. या जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपले कुटुंब आणि त्यांच्या साधनांच्या पालनपोषणार्थ कर्म करीत असतो; परंतु कोणीही काही तरी वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक तृप्तीवाचून, मग ती व्यक्तिगत असेल किंवा व्यापक असेल, कर्म करीत नाही. कर्मफलांचा उपभोग घेणाऱ्यादृष्टीने कर्म न करता कृष्णभावनाभावित कर्म करणे हीच परिपूर्णतेची कसोटी आहे. कृष्णभावनायुक्त कर्म करणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे, कारण सर्व जीव स्वरुपत: भगवंतांचे अंश आहेत. शरीराचे अवयव संपूर्ण शरीराच्या संतुष्टीप्रीत्यर्थ कार्य करीत असतात. शरीराचे अवयव स्व-तृप्तीकरिता कार्य करीत नसून संपूर्ण शरीराच्या संतुष्टीप्रीत्यर्थ कार्य करतात. त्याचप्रमाणे, जो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता, परम सत्याच्या संतोषार्थ कर्म करतो तो परिपूर्ण असा संन्यासी किंवा योगी आहे.

संन्याशांना कधीकधी वाटते की, ते सर्व भौतिक कर्तव्यातून मुक्त झाले आहेत आणि म्हणून ते अग्निहोत्र यज्ञ करण्याचे थांबवितात, परंतु वास्तविकपणे ते स्वार्थीच आहेत, कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे हेच त्यांचे ध्येय असते. या प्रकारच्या इच्छा असणे हे इतर कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे; परंतु ही इच्छा सुद्धा स्वार्थयुक्त आहे. त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन, अर्धोन्मीलित नेत्रांनी योगपद्धतीचे आचरण करणाऱ्यायोग्याला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असतेच, पण कृष्णभावनाभावित कर्म करणारा मनुष्य स्वार्थाशिवाय परम सत्याच्या संतोषार्थ कर्म करतो. कृष्णभावनाभावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हीच त्याची यशाची व्याख्या असते आणि म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो. त्यागाचे परमोच्च प्रतीक असणारे श्री चैतन्य महाप्रभू पुढीलप्रमाणे प्रार्थना करतात.

न धनं न जनं न सुन्दरीं कवितां वा जगदीश कामये॥ मम जन्मनि जन्मनीश्वरे भवताद्भक्तीरहैतुकी त्वयि॥

‘‘हे सर्वशाक्तिमान प्रभो! मला धनसंचय करण्याची किंवा सुंदरींचा उपभोग घेण्याचीही इच्छा नाही. तसेच मला पुष्कळ अनुयायी जमविण्याचीही इच्छा नाही. माझी एकच इच्छा आहे की जन्मजन्मांतर माझ्यावर तुमच्या अहैतुकी भक्तिपूर्ण सेवेची कृपा व्हावे.’’

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com