वेदाबेस​

श्लोक 3 . 31

ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१ ॥

शब्दार्थ

ये-जे कोणी; मे-माझ्या; मतम्-उपदेश किंवा आदेश; इदम्-या; नित्यम्-नित्यकार्य म्हणून; अनुतिष्ठन्ति-नियमितपणे पालन करतात; मानवा:-मनुष्य; श्रद्धा-वन्त:- श्रद्धा आणि भक्तीसहित; अनसूयन्त:- द्वेषरहित किंवा निमत्सर; मुच्यन्ते-मुक्त होतात; ते-ते सर्व; अपि-जरी; कर्मभि:- सकाम कर्माच्या बंधनातून. - -

भाषांतर

जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात.

तात्पर्य

पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवादरहित शाश्‍वत सत्य आहे. ज्याप्रमाणे वेद शाश्‍वत आहेत त्याचप्रमाणे कृष्णभावनेचे हे सत्यही शाश्‍वत आहे. भगवंतांचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णावर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत; परंतु भगवंतांच्या शाश्‍वत उपदेशांवर श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी तो कर्मबंधनातूमन मुक्त होतो. कृष्णभावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंतांच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही, पराभव आणि निराशा यांची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो तो निश्चितपणे कृष्णभावनेच्या विशुद्ध स्तराप्रत उन्नती करतो.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com