वेदाबेस​

श्लोक 3 . 29

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्ज‍न्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत् ॥ २९ ॥

शब्दार्थ

प्रकृते:-भौतिक प्रकृतीच्या; गुण-गुणांद्वारे; सम्मूढा:- प्रकृतीच्या तादात्म्याने मूर्ख झालेला; सज्जन्ते-ते मग्न होतात; गुण-कर्मसु-भौतिक कार्यांमध्ये; तान्-ते; अकृत्स्न-विद:-अल्पज्ञानी मुनष्य; मन्दान्-आत्मसाक्षात्कारामध्ये मंद; कृत्स्न-वित्-ज्याला वास्तविक ज्ञान आहे; न-नाही; विचालयेत-विचलित करण्याचा प्रयत्न.

भाषांतर

भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मांत पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात, पण असे कर्म करणार्‍यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये.

तात्पर्य

अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्या तादात्म्य करतात आणि ते भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात. हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे आणि जी शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे. त्याला मन्द किंवा आत्मज्ञान नसणारा मूढ व्यक्ती असे म्हटले जाते. अज्ञानीजन शरीराला आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडांच्या विधींनाच सर्व काही मानतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक, राष्ट्रीयता आणि परोपकारवाद इत्यादी कार्ये असतात. अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात, कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पना आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसते. तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा एखाद्याने स्वत:चे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे. असे मोहित व्यक्ती, अंहिसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्त्वांमध्ये निमग्न होऊ शकतात.

अज्ञानी मनुष्यांना कृष्णभावनाभावित कर्माचे महत्व असू शकत नाही, म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की, आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दवडू नये. पण भगवद्भक्त हे भगवंतांपेक्षाही दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो. यास्तव ते या प्रकारचा धोका पत्करतात. इतकेच काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्णभावनाभावित कर्मांमध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात. कारण कृष्णभावानाभावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी आवश्यक आहे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com