श्लोक 3 . 15
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥ १५ ॥
शब्दार्थ
कर्म-कर्म; ब्रह्म-वेदंपासून; उद्भवम्- उत्पन्न झालेले; विद्धि-तू जाण; ब्रह्म-वेद; अक्षर-परब्रह्मापासून; समुद्धवम्- प्रत्यक्ष प्रकट झाले आहे; तस्मात्- म्हणून; सर्व-गतम्- सर्वव्यापी; ब्रह्म-ब्रह्म; नित्यम्- शाश्वतरीत्या; यज्ञे-यज्ञामध्ये; प्रतिष्ठितम्-स्थित आहे.
भाषांतर
वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरीत्या स्थित झाले आहे
तात्पर्य
यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्रीविष्णू यांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ कर्म करावयाचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून वेद हे कर्मविधींची संहिता आहे. वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते.म्हणून कर्मांच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रनियमांनुसार कर्म करावे लागते. त्याप्रमाणे मनुष्याने भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ राज्याच्या नियमांनुसार कर्म केले पाहिजे. वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंतांच्या नि:श्वासातून प्रकट झाले आहेत. असे म्हटले आहे की अस्य महतो भूतस्य निश्वासितम् एतद् यद्ऋग्वेदी यजुर्वेद: सामवेदोऽथर्वाङ्गिरस:-’ ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्या नि:श्वासातून प्रकट झाले आहेत.’ (बृहदारण्यक उपनिषद् 4.5.11).भगवंत हे सर्वशक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात. कारण ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की, भगवंत इतके सर्वशक्तिमान आहेत की, ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, भगवंत आपल्या श्वासोच्छासाद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्याद्वारे गर्भधारणाही करू शकतात. वास्तविकपणे, असे म्हटले आहे की, त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा केली. निर्मिती किेंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांमध्ये असे मार्गदर्शन दिले. ज्यांना स्वीकार करून बद्ध जीव भगवद्धामात परत येऊ शकतील. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात; पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की, ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंतांकडे परत जाऊ शकतो. मोक्षप्राप्ती करणे ही बद्ध जीवांसाठी एक संधीच असते. म्हणून कृष्णभावनाभावित होऊन बद्ध जीवांनी यज्ञपद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ठभावनेच्या तत्त्वाचा अंगीकार करू शकतात. कारण कृष्णभावनेला अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com