वेदाबेस​

श्लोक 2 . 66

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ॥ ६६ ॥

शब्दार्थ

न अस्ति- असू शकत नाही; बुद्धि:- दिव्य बुद्धी; अयुक्तस्य- जो कृष्णभावनेशी संबंधित नाही; न-नाही; च-आणि; अयुक्तस्य- कृष्णभावनारहित असणारा; भावना - स्थिर मन किंवा स्थिर भावना (सुखामध्ये); न-नाही; च- आणि ; अभावयत:- जो स्थिर नाही त्याचा; शान्ति:- शांती; अशान्तस्य- जो अशांत आहे त्याचा; कृत:- कोठून; सुखम्-सुख.

भाषांतर

जो भगवंतांशी संबंधित नाही (कृष्णभावनेमध्ये) त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांतीवाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल?

तात्पर्य

जोपर्यंत मनुष्य कृष्णभावनाभावित होत नाही तोपर्यंत त्याला शांतता-प्राप्तीची शक्यताच नाही. म्हणून पाचव्या अध्यायात (5.29) निश्चितपणे सांगितले आहे की, जेव्हा एखादा मनुष्य जाणतो की, तप आणि यज्ञ यांच्या सर्व शुभफलांचे श्रीकृष्ण हेच केवळ भोक्ता आहेत, संपूर्ण प्राकृत सृष्टीचे स्वामीही तेच आहेत सर्व प्राणिमात्राचे तेच खरे मित्र आहेत, तेव्हाच त्याला वास्तविक शांतीची प्राप्ती होते. म्हणून जो कृष्णभावनाभावित नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय असूच शकत नाही. अंतिम ध्येयाचाच अभाव असल्यामुळे मनामध्ये चंचलता असते. जेव्हा एखादा निश्चितपणे जाणतो की, श्रीकृष्ण हेच भोक्ता, स्वामी आणि प्रत्येकाचे मित्र आहेत तेव्हाच तो स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो. म्हणून जे श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करतात ते निश्चितपणे नेहमी दु:खी आणि अशान्तच असतात.जरी त्याने जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते खचितच नेहमी दु:खी आणि अशान्तच असतात. कृष्णभावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थिती आहे, जी केवळ श्रीकृष्णाशी संबंध ठेवल्यानेच प्राप्त होऊ शकते.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com