Bg. 2.39
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ ३९ ॥
शब्दार्थ
एषा- हे सर्व; ते- तुला; अभिहिता- वर्णन केले; साङ्ख्ये - पृथक्करणात्मक विश्लेषणाद्वारे; बुद्धि:- बुद्धी; योगे - निष्काम कर्मामध्ये; तु-पण; इमाम्- हे; श्रृणू- ऐक; बद्ध्या- बुद्धीद्वारे; युक्त:- नियुक्त; यया-ज्याद्वारे; पार्थ-हे पृथापुत्र; कर्म-बन्धम् - कर्मबंधनातून; प्रहास्यसि-तु मुक्त होशील. - -
भाषांतर
आत्तापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे.आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक. ह पार्था! जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातूमन मुक्त होऊ शकशील.
तात्पर्य
वैदिक शब्दकोश निरुक्ति यात म्हटल्याप्रमाणे संख्या म्हणजे जे सर्व गोष्टींचे विस्तृत रुपात वर्णन करते आणि जीवात्म्याच्या स्वरुपस्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे हे सांख्य तत्वज्ञान होय. योग हा इंद्रियनिग्रह करण्याशी संबंधित आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रियतृप्तीवर आधारित होता. आपले आद्य कर्तव्य विसरुन त्याला युद्धापासून परावृत्त व्हावयाचे होते. कारण त्याला वाटत होते की,धृतराष्ट्रपुत्र, चुलते, बंधू इत्यादींची हत्या करून राज्योपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ. दोन्ही गोष्टी मूलत: इंद्रियतृप्तीवरच आधारित होत्या. बुद्धी आणि कर्तव्यांचा त्याग केला तरही नातलगांवर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख, ही दोन्ही सखे वैयक्तिक इंद्रियतृप्तीवर आधारित आहेत.म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावयाचे होते की, आपल्या पितामहांच्या शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगता की, भगवंतांसहित सर्व उपस्थित व्यक्तींचे स्वत्व नित्यच असते. त्या सर्व व्यक्तींना भूतकाळात स्वत्व होते. वर्तमान काळात स्वत्व आहे आणि भविष्यातही त्यांना स्वत्व राहील. कारण आपल्याला सनातन काळासाठी स्वत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले स्वत्व ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे आणि आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनांतून सांगण्यात आले आहे. तोतया कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाचा या सांख्य तत्वज्ञानाशी काडीमात्रही संबंध नाही. नास्तिक कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाच्याही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णांचे अवतार मूळ, भगवान कपिल यांनी श्रीमद्भागवतात आपली माता देवहुतीला सांख्य तत्वज्ञान सांगितले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, पुरुष किंवा परमेश्वर हेच कर्ता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदांमधील वर्णनावरून आपल्याला कळून यते की, परमेश्वरांनी प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अणुरुप जीवात्मे प्रवेशित केले. हे सर्व जीवात्मे इंद्रियतृप्तीखातर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वत:ला उपभोक्ता समजत आहेत. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते त्यावेळी जीवात्मा भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो. हा मायेचा किंवा इंद्रियतृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेकानेक जन्मांत इंद्रियतृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. याप्रकारे त्याची परम सत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते.
अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोगयुक्त होऊन कसे कार्य करावे याबद्दल सांगतील. दुसर्य शब्दांत सांगावयाचे झाल्यास केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याबद्दल सांगतील. या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन ‘प्रत्येकांच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध’ असे करण्यात आले आहे. (श्रीमद्भगवद्गीता 10.10) परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवद्भक्तीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून जो भगवंतांच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममयी सेवेमध्ये, दुसऱ्या शब्दांत, कृष्णभावनेमध्ये स्थित झाला आहे त्यालाच भगवंतांच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. यासाठीच भगवंत सांगतात की, जे दिव्य प्रेमामुळे भगवद्भक्तीमध्ये नित्य रममाण होतात त्यांनाच फक्त ते भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. याप्रकारे भक्त सहजरीत्या नित्य आनंदमयी अशा भगवद्धर्माची प्राप्ती करू शकतो.
याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजेच भगवद्भक्ती होय आणि या ठिकाणी उल्लेख केलेल्या सांख्य शब्दाचा तोतया कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाशी काडीमात्राही संबंध नाही. यासाठीच, या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या सांख्य योगाचा नास्तिक सांख्य तत्वज्ञानाशी संबंध आहे. अशी कोणीही गैरसमजूत करून घेऊ नये. तसेच त्याकाळी त्या नास्तिक सांख्य तत्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण अशा निरीश्वरवादी भोंदू तत्वज्ञानाचा उल्लेख करणेही शक्य नाही. वास्तविक सांख्य तत्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिलांनी श्रीमद्भागवतात केले आहे. पण त्याचाही वर्तमान विषयांशी अजिबात संबंध नाही. याठिकाणी सांख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे पृथक्करणात्मक विवेचन आहे. केवळ अर्जुनाला बुद्धियोग किंवा भक्तियोगाप्रत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचे विस्तृत विवेचन केले आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांचे सांख्य आणि भगवान कपिलांचे भागवतातील सांख्य तत्वज्ञान एकच आहे. तो सर्व भक्तियोगच आहे. यासाठीच भगवान श्रीकृष्ण सांगतात की, जे अल्पबुद्धी लोक आहेत तेच केवळ सांख्ययोग आणि भक्तियोग यांमध्ये भेद करतात. (सांख्यायोगी पृथग्बाला: प्रवदन्ति न पण्डिता:)
अर्थात, नास्तिक सांख्ययोगाचा भक्तियोगाशी मुळीच संबंध नाही. तरीसुद्धा अज्ञानी लोक दावा करतात की, नास्तिक सांख्ययोगाचाच उल्लेख भगवद्गीतेत केला आहे.
म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की, बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्णभावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी जो केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्वाद्वारे कार्य करीत असतो. यामुळे तो नित्य दिव्यानंदामध्ये रममाण असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत्कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. कृष्णभावनाभावित कर्म आणि सकाम कर्म, विशेषत्वे कुटुंबप्राप्ती किंवा भौतिक सुखप्राप्ती करून इंद्रियतृप्तीसाठी केलेल्या कर्मामध्ये बराच फरक आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com