वेदाबेस​

श्लोक 2 . 33

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ ३३ ॥

शब्दार्थ

अथ - म्हणून; चेत् - जर; त्वम् -तू; इमम् - या; धर्म्यम् -धर्मकर्तव्य म्हणून; सङ्ग्रामम् -युद्ध; न-नाही; करिष्यसि-करणार; तत:-तर मग; स्व-धर्मम्-तुझे धार्मिक कर्तव्य; कीर्तिम् - कीर्ती; च-सुद्धा; हित्वा- गमावणे; पापम् - पापकर्मफल; अवाप्स्यसि- प्राप्त करशील.

भाषांतर

परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील.

तात्पर्य

अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरांसहित इतर देवदेवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. शिकाऱ्याच्या वेषात आलेल्या भगवान शंकरांचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले व पाशुपतास्त्र नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहीत होते. द्रोणाचार्यांनीही त्याला आशीर्वाद दिले व असे अस्त्र वरदान दिले की ज्यायोगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्याचा पिता व स्वर्गाचा राजा इंद्र यांच्यासहित इतर अनेक अधिारी व्यक्तींकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दलची विश्वसनीयता प्राप्त केली होती, परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला, तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्यच टाळले असे नव्हे तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिकही गमावून बसला असता आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वत:च राजमार्ग बनवला असता. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com