वेदाबेस​

श्लोक 2 . 31

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१ ॥

शब्दार्थ

स्व-धर्मम् - आपली स्वत:ची धर्मतत्त्वे; अपि - सुद्धा ; च-खचित; अवेक्ष्य-विचार करून ; न- कधीही नाही; विकम्पितुम् -संकोच करणे; अर्हसि - तू योग्य आहेस; धर्म्यात् - धर्मतत्त्वांसाठी; हि-खचित; युद्धात -युद्ध करण्यापेक्षा: श्रेय: - योग्य कार्य; अन्यत्-इतर कोणतेही; क्षत्रियस्य - क्षत्रियाला; न- नाही; विद्यते -आहे. - -

भाषांतर

क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की, तुला धर्मतत्त्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही.

तात्पर्य

सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या चार वर्णांमधील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते व हा वर्ण उत्तम राज्यकारभार करण्यासाठी असतो. क्षत् म्हणजे पीडा किंवा इजा. जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते. (त्रायते-संरक्षण देणे) क्षत्रियांना अरण्यात शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असत आणि वाघाबरोबर तलवारीने झुंज देत असत. वाघाची शिकार झाल्यावर त्याचे राजकीय, मानसन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असते. जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आजतागायत या पद्धतीने पालन करीत आहेत. क्षत्रियांना विशेषत्वे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. कारण काही वेळा धार्मिक हिंसा ही आवश्यक बाब असते. म्हणून क्षत्रिय एकदम संन्यासश्रम स्वीकारू शकत नाहीत. राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते, पण एक अविभाज्य तत्व म्हणून ती असू शकत नाही. धार्मिक न्यायसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की,

आहवेषु मिथोऽन्योन्यं जिघांसन्तो महीक्षित:। युद्धमाना: परं शक्त्या स्वर्ग यान्त्यपराङ्मुखा:॥

यज्ञेषु पशवो ब्रह्मन् हन्यन्ते सततं द्विजै:। संस्कृता: किल मन्त्रैश्च तेऽपि स्वर्गमवाप्नुवन् ॥

‘‘रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय त्याचा मत्सर करणाऱ्या राजाशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्गप्राप्ती करण्यास योग्य होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मणही यज्ञामध्ये पशूंची आहुती देऊन स्वर्गप्राप्ती करतात. म्हणून धार्मिक तत्वपालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे या मुळीच हिंसक कृती मानल्या जात नाहीत. कारण यामध्ये धर्मतत्त्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकलाच लाभ होतो. यज्ञबळीला, एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत्क्रांतीमार्गातून न जाता तात्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही, यज्ञबळी देऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणांप्रमाणेच स्वर्गप्राप्ती होते.’’

स्वधर्म किंवा विशेष कर्तव्ये दोन प्रकारची आहेत. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्षप्राप्तीसाठी धर्मतत्वप्रमाणे कर्तव्य करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्ये शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरुप प्राप्त होते. ब्राह्मण आणि क्षत्रियांना शारीरिक स्वतराव विशिष्ट नियत कर्तव्ये नेमून दिलेली असतात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंताने नेमून दिलेला आहे आणि याचे स्पष्टीकरण चौथ्या अध्यायात केले जाईल.शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणांनुसार नेमून दिलेल्या कर्तव्यांपासून होतो. ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com