वेदाबेस​

श्लोक 2 . 23

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्ल‍ेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३ ॥

शब्दार्थ

न-कधीच नाही; एनम् - हा आत्मा; छिन्दन्ति-कापून तुकडे तुकडे करणे; शस्त्राणि-शस्त्रे; न-कधीच नाही; एनम्-हा आत्मा; दहति-जाळणे शक्य आहे; पावक:-अग्नी; न-कधीच नाही; च-सुद्धा; एनम्-हा आत्मा; क्लेदयन्ति-भिजविणे शक्य आहे; आप:- पाणी; न-कधीच नाही; शोषयति-कोरडा किंवा शुष्क पडतो; मारुत:-वारा.

भाषांतर

या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही.

तात्पर्य

तलवारी, अग्निशास्त्रे, वर्षाअस्त्रे, चक्रीवादळ इत्यादी जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत. आधुनिक अग्निवर्षाव करणाऱ्या शस्त्रास्त्रांव्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादींपासून बनलेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. आधुनिक युगातील अण्वस्त्रांची वर्गवारीसुद्धा अग्निशस्त्रांमध्ये केली जाते, परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्त्वांपासून बनविलेली इतर शस्त्रास्त्रे होती. अग्नि -शस्त्रांचा प्रतिकार जलास्त्रांनी (वरुणास्त्र) केला जात असे. पण अशी वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. तसेच आधुनिक वैज्ञानिकांना पवनास्त्रांचेही ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्रांद्वारे त्याचा संहारही होऊ शकत नाही.

जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाही. व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना अलग करणे शक्य नाही; खरे तर व्यक्तिगत जीवात्मे हे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असलेले अंश आहेत. जीवात्मे हे सनातन अणुरुप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मकदृष्ट्या अग्नीप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून अलग झाल्यावर विझतात त्याप्रमाणे जीवात्मेही भगवंतांच्या सान्निध्यातून विभक्त होतात. वराहपुराणात जीवात्म्यांचे वर्णन भगवंतांपासून वेगळे झालेले अंश असे केले आहे आणि शाश्वतरीत्या हे जीवात्मे अंशच राहतात. असे भगवद्गीताही सांगते. म्हणून भगवंतांनी अर्जुनला दिलेल्या शिकवणुकीवरून स्पष्ट होते की, मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व हे टिकून राहते. श्रीकृष्णांकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला; परंतु तो श्रीकृष्णाशी कधीच एकरूप झाला नाही.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com