श्लोक 2 . 18
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥ १८ ॥
शब्दार्थ
अन्त-वन्त:- नाशवंत; इमे - हे सर्व; देहा- भौतिक शरीरे; नित्यस्य -नित्य अस्तित्वात असणाऱ्या; उक्ता:- असे म्हटले जाते; शरीरिण:- देहधारी जीवाचे; अनाशिन:- अविनाशी; अप्रमेयस्य-अमर्याद असणाऱ्या; तस्मात्- म्हणून; युध्यस्व-युद्ध कर; भारत - हे भरतवंशजा.
भाषांतर
अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, म्हणून हे भरतवंशजा! तू युद्ध कर.
तात्पर्य
स्वभावत:च भौतिक शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तात्काळ किंवा शंभर वर्षांनंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही; परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही, मारला जाण्याचे तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की. त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणालाही कल्पनाही नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनांतून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरुपस्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वेदान्त सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश या भौतिक शरीराचे पालनपोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तात्काळ शरीर सडण्यास प्रारंभ होते. यावरून कळून येते की, जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर हे महत्वपूर्ण नाही. भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्माप्रीत्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला होता.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com