वेदाबेस​

श्लोक 2 . 16

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ १६ ॥

शब्दार्थ

न-कधीच नाही; असत:-जे असत् आहे ते; विद्यते - आहे; भाव:- चिरस्थायित्व; न- कधीच नाही; अभाव:- बदलण्याचा गुणधर्म; विद्यते- आहे; सत:- जे शाश्वत आहे त्याचा; उभयो:- दोहोंचा; अपि-खरोखरच; दृष्ट:-पाहिलेला आहे; अन्त:- निर्णय, निष्कर्ष; तु-नि:संदेह; अनयो:-या दोन्हींचा; तत्व-सत्याचा; दर्शिभि:-साक्षात्कारी पुरुषांद्वारा. - -

भाषांतर

जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, जे असत् (भौतिक शरीर) आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत् (जीवात्मा) आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या स्वरुपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरूषांनी असा निष्कर्ष काढला आहे.

तात्पर्य

परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की, विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणी शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते, पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो. पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे. स्वभावत: शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे. विष्णुपुराणामध्ये (2.12.38)सांगण्यात आले की, विष्णू व त्यांचे धाम या सर्वांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. (ज्योतीषि विष्णुर्भुवनानि विष्णु:) सत् व असत् हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे.

अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश भगवंतांनी केला आहे त्याचा आरंभ येथपासूनच होतो. अज्ञान नहीसे करणे म्हणजे पूजक व पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे, तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय. कोणताही मनुष्य प्रथम स्वत:ला जाणून घेऊन भगवंतांचे स्वरुप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध, अंश आणि अंशी किंवा अंश व पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो. वेदान्त सूत्रे तसेच श्रीमद्‌भगवतात, समस्त सृष्ट पदार्थाचे उत्पत्तिस्थान म्हणून भगवंतांचा स्वीकार करण्यात आला आहे. अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते. सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे परा प्रकृतीत येतात. जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो त्याप्रमाणे जीव हे नेहमी भगवंतांच्या अधीनच असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे. असे अज्ञान काढून टाकण्याकरिता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com