वेदाबेस​

श्लोक 18.59

यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे ।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ ५९ ॥
-

शब्दार्थ

यत्-जर; अहङ्कारम्-अहंकाराच्या;आश्रित्य-आश्रय घेऊन; न योत्स्ये-मी युद्ध करणार नाही; इति-याप्रमाणे; मन्यसे-मानतोस; मिथ्या एषः-हे सर्व मिथ्या आहे; व्यवसायः-निश्चय; ते- तुझ्या; प्रकृतिः-प्रकृती; त्वाम्-तू; नियोक्ष्यति--नियुक्त होशील.

भाषांतर

जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करील.

तात्पर्य

क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वभावच होता; पण मिथ्या अहंकारामुळे आपले गुरू, पितामह आणि मित्र यांना मारण्याचे पाप लागेल अशी त्याला भीती वाटत होती. वास्तविकपणे तो स्वतःलाच आपल्या कर्माचा कर्ता समजत होता, जणू काही अशा कर्माच्या शुभ आणि अशुभ फळाचा तोच अधिकारी होता. साक्षात पुरुषोत्तम भगवान त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याचेही त्याला विस्मरण झाले होते. हीच बद्ध जीवाला होणारी विस्मृती होय. शुभ आणि अशुभ गोष्टींबद्दल भगवंत मार्गदर्शन करतात आणि जीवनाची परमसिद्धी प्राप्त करण्याकरिता मनुष्याने केवळ कृष्णभावनाभावित कर्म करणे आवश्यक असते. मनुष्याने भाग्य, भगवंतांप्रमाणे इतर कोणीही निश्चित करू शकत नाही. यास्तव भगवंतांकडून मार्गदर्शन प्राप्त करणे आणि त्या मार्गदर्शनानुसार कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या अर्थात, आध्यात्मिक गुरुच्या आदेशांची मुळीच उपेक्षा करू नये. भगवंतांच्या आदेशांचे पालन करण्याकरिता नि:संकोचपणे कर्म केले पाहिजे. यामुळे मनुष्य सर्व परिस्थितीत सुरक्षित राहू शकेल.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com