वेदाबेस​

अध्याय सतरावा

श्रद्धात्रयविभागयोग

श्लोक 1: अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण! जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात, त्यांची काय अवस्था असते? ते सत्त्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात?

श्लोक 2: श्रीभगवान म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी तीन प्रकारची असू शकते. याविषयी आता माझ्याकडून ऐक.

श्लोक 3: हे भारता! विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते.

श्लोक 4: सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूतप्रेतांचे पूजन करतात.

Text 5-6: जे लोक दंभ आणि अहंकाराने, शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्त्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात त्यांना असुर म्हटले जाते.

श्लोक 7: प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार तीन प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही तीन प्रकार असतात. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो ते ऐक.

श्लोक 8: सत्त्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार, त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवनशुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार, रसयुक्त,स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो.

श्लोक 9: रजोगुणी मनुष्यांना, अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दु:ख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो.

श्लोक 10: तीन तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजविलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते.

श्लोक 11: फलाची आकांक्षा न करणारे, आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय,

श्लोक 12: परंतु, हे भरतश्रेष्ठा! दंभार्थ किंवा भौतिक लाभप्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाणा.

श्लोक 13: शास्त्रविधींची उपेक्षा करून, प्रसाद वितरित केल्यावाचून, मंत्रोच्चारण न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो.

श्लोक 14: भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरू व मातापित्यांसारख्या जेष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते.

श्लोक 15: सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षेब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेदपठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात.

श्लोक 16: आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत

श्लोक 17: भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणा-या व केवळ परमेश्वराप्रीत्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात.

श्लोक 18: सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात.

श्लोक 19: आत्म-पीडा करवून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात, त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते.

श्लोक 20: कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते.

श्लोक 21: परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते.

श्लोक 22: अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणा-या दानाला तामसिक दान म्हटले जाते.

श्लोक 23: सृष्टीच्या आरंभापासूनच'ॐतत् सत्' हे तीन शब्द परम सत्याचा निर्देश करण्यासाठी योजिले जातात. वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टीप्रीत्यर्थ यज्ञ करताना, ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असत.

श्लोक 24: म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी, शास्त्रोक्त विधिविधानांनुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी, या सर्व क्रियांचा ॐकारापासून आरंभ करतात.

श्लोक 25: फळाची इच्छा न करता मनुष्याने 'तत्' शब्दाद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे.

Text 26-27: परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत्‌ या शब्दाने निर्देशिले जाते. अशा यज्ञकत्र्यालाही सत् असे म्हटले जाते. तसेच हे पार्थ! परब्रह्माच्या संतुष्टीप्रीत्यर्थ केल्या जाणा-या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मानाही सत् असे म्हणतात.

श्लोक 28: परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते, ते अनित्यच होय. अशा कर्माला'असत्'म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मीसुद्धा व्यर्थच ठरते.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com