वेदाबेस​

श्लोक 14.17

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥ १७ ॥
-

शब्दार्थ

सत्त्वात्—सत्त्वगुणापासून; सञ्जायते-उत्पन्न होते; ज्ञानम्-ज्ञान; रजसः-रजोगुणापासून; लोभः—लोभ; एव-निश्चितपणे; च-सुद्धा; प्रमाद-प्रमाद; मोहौ-आणि मोह; तमसः-- तमोगुणापासून; भवतः-उत्पन्न होतो; अज्ञानम्-अज्ञान; एव-निश्चितपणे; च-सुद्धा.

भाषांतर

सत्त्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते.

तात्पर्य

आधुनिक संस्कृती ही जीवांसाठी फारशी हितावह नाही म्हणून त्यांच्यासाठी कृष्णभावनामृताचा विधी सांगण्यात आला आहे. कृष्णभावनेद्वारे समाजामध्ये सत्त्वगुणाचा विकास होईल. जेव्हा सत्त्वगुणाचा विकास होईल तेव्हा लोक वस्तूंना यथार्थ रूपामध्ये पाहू शकतील. तमोगुणी लोक हे पशुवतच असतात आणि म्हणून ते वस्तूंना यथार्थ रूपामध्ये पाहू शकत नाहीत. उदाहरणार्थ, तमोगुणाच्या प्रभावामुळे ते जाणू शकत नाहीत की, प्राण्यांची हत्या केल्याने पुढील जन्मी ते त्याच पशूकडून मारले जाण्याची शक्यता आहे. लोकांना वास्तविक ज्ञानाचे शिक्षण नसल्यामुळे ते बेजबाबदार होतात. हा बेजबाबदारपणा बंद करण्यासाठी, सामान्य लोकांमध्ये सत्वगुणांचा कसा विकास करता येईल याचे शिक्षण देण्यात यावे. त्यांना जेव्हा सत्वगुणाचे शिक्षण देण्यात येईल, तेव्हा त्यांना वस्तूंचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे ते विवेकी बनतील. अशा रीतीने लोक सुखी आणि वैभवशाली होतील. बहुसंख्य लोक जरी सुखी आणि समृद्ध झाले नाही तरी काही टके लोक जर कृष्णभावनेचा विकास करून सत्वगुणात स्थित झाले तरी, संपूर्ण जगभर सुखशांती नांदण्याची शक्यता आहे. अन्यथा जर जग रज आणि तमोगुणाच्या आहारी गेले तर शांती-समृद्धीची शक्यताच राहणार नाही. रजोगुणामध्ये लोक लोभी होतात आणि त्यांच्या इंद्रियतृप्तीच्या लालसेला अंतच नसतो. आपण पाहू शकतो की, मनुष्याकडे जरी पुरेसा पैसा आणि इंद्रियतृप्ती करण्याची पुरेशी साधने असली तरी सुद्धा त्याला मन:शांतीही लाभत नाही किंवा सुखही लाभत नाही. रजोगुणामध्ये स्थित असल्यामुळे मनुष्याला मन:शांती किंवा सुखप्राप्तीची शक्यताच नाही. जर त्याला खरोखर सुखी व्हावयाचे असेल तर त्याच्याकडे असणारा पैसा त्याला मदत करू शकणार नाही. त्याला कृष्णभावनेच्या अभ्यासाद्वारे स्वतःची सत्वगुणाप्रत उन्नती करणे आवश्यक आहे. रजोगुणी मनुष्य हा केवळ मानसिकदृष्ट्याच दुःखी असतो असे नव्हे तर त्याचा व्यवसायही कष्टप्रद असतो. आपली प्रतिष्ठा राखण्याकरिता पुरेसा पैसा मिळविण्यासाठी त्याला अनेक युक्त्या आणि योजना कराव्या लागतात. हे सारे कष्टदायक असते. तमोगुणामध्ये लोक मूख बनतात. आपल्या परिस्थितीमुळे निराश झाल्याने ते नशा उत्पन्न करणा-या व्यसनांचा आश्रय घेतात आणि अशा रीतीने अज्ञानात अधिकाधिक पतित होतात. त्यांचे भविष्यकालीन जीवन फार अंधकारमय असते.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com