वेदाबेस​

श्लोक 12.13 -14

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र: करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कार: समदु:खसुख: क्षमी ॥ १३ ॥
सन्तुष्ट: सततं योगी यतात्मा दृढनिश्चय: ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भ‍क्त: स मे प्रिय: ॥ १४ ॥
-
 
-

शब्दार्थ

अद्वेष्टा-द्वेषरहितः सर्व-भूतानाम्—सर्वं जीवांप्रति; मैत्रः-मित्रत्व; करुणः--करुणा; एव-- निश्चितपणे; च—सुद्धाः निर्ममः-स्वामित्वाच्या भावनेरहित; निरहङ्कारः--मिथ्या अहंकाररहित; सम-समभाव; दु:ख-दुःख; सुखः-आणि सुखामध्ये; क्षमी-क्षमाशील; सन्तुष्ट:-संतुष्ट; सततम्—सतत; योगी-भक्तीमध्ये संलग्न झालेला; यत-आत्मा—आत्मसंयमी; दृढ-निश्चयः— दृढ निश्चयाने, मयि-माझ्या ठायी; अर्पित—संलग्न; मनः-मन; बुद्धिः-आणि बुद्धी; य:- जो; मत्-भक्तः-माझा भक्तः; सः—तो; मे-मला; प्रियः-प्रिय.

भाषांतर

जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे.

तात्पर्य

शुद्ध भक्तीबद्दल पुन्हा बोलताना भगवंत या दोन श्लोकांमध्ये शुद्ध भक्ताच्या दिव्य लक्षणांचे वर्णन करीत आहेत. शुद्ध भक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही. तो कोणाचाही द्वेष करीत नाही. तसेच तो शत्रूशीही वैर करीत नाही. त्याला वाटते की, 'माझ्या वाईट पूर्वकर्मामुळेच तो माझ्याशी शत्रुत्व करीत आहे. म्हणून प्रतिकार करण्यापेक्षा सहन करणे चांगले आहे.' श्रीमद्भागवतात (१०.१४.८) म्हटले आहे की, ततेऽनुकम्पां सुसमीक्षमणे भुञ्जान एवात्मकृतं विपाकम्-जेव्हा भक्तावर दुःख किंवा संकट ओढवते तेव्हा त्याला वाटते की, ही दु:खे किंवा संकटे म्हणजे भगवंतांची आपल्यावरील कृपाच आहे. त्याला वाटते की, माझ्या पूर्वजन्मातील दुष्कृत्यांमुळे वास्तविकपणे मी जे दुःख भोगत आहे त्यापेक्षा पुष्कळच अधिक दुःख भोगावयास पाहिजे; परंतु भगवंतांच्या कृपेनेच मी ज्या शिक्षेस पात्र आहे ती शिक्षा मिळत नाही. भगवंतांच्या कृपेने मला अल्पशीच शिक्षा भोगावी लागत आहे. म्हणून संकटामध्ये देखील तो सदैव शांत, स्वस्थ आणि धीर असतो. भक्त हा शत्रूसहित प्रत्येकाशीच सदैव दयेने वागतो. निर्माम म्हणजे भक्त हा शारीरिक दुःखांना आणि कष्टांना जास्त महत्त्व देत नाही, कारण तो पूर्णपणे जाणतो की, मी म्हणजे हे भौतिक शरीर नाही. त्याच्या ठायी देहात्मबुध्दी नसते म्हणून तो मिथ्या अहंकारापासून मुक्त असतो आणि सुखदुःखांना समानतेने पाहतो. तो सहनशील असतो आणि भगवद्कृपेने जे काही प्राप्त होते त्यातच संतुष्ट असतो. यापेक्षा अधिक काही प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करीत नसल्यामुळे तो सदैव आनंदी असतो. तो परिपूर्ण योगी असतो, कारण आध्यात्मिक गुरूकडून प्राप्त झालेल्या आदेशांचे पालन करण्यात तो दृढ असतो आणि त्याची इंद्रिये संयमित असल्यामुळे तो निश्चयी असतो. वादविवादामुळे तो डळमळून जात नाही, कारण भक्ती करण्याच्या त्याच्या दृढ निश्चयापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकत नाही. तो पूर्णपणे जाणतो की, श्रीकृष्ण हेच आदिपुरुष आहेत. म्हणून त्याला कोणीही विचलित करू शकत नाही. या सर्व गुणांमुळे तो आपले मन आणि आपली बुद्धी पूर्णपणे भगवंतांवर स्थिर करू शकतो. भक्तीचा असा हा आदर्श निश्चितच दुर्मिळ आहे आणि भक्तीच्या विधिनियमांचे पालन करून तो भक्तीच्या आदर्श अवस्थेप्रत उत्रत होतो. भगवंत यापुढेही सांगतात की, असा भक्त हा मला अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्या परिपूर्ण कृष्णभावनाभावित क्रियांमुळे मी सदैव प्रसन्न असतो.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com