वेदाबेस​

Bg. 10.14

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवा: ॥ १४ ॥
-

शब्दार्थ

सर्वम्-सर्व, एतत्—याप्रमाणे; ऋतम्-सत्य; मन्ये—मी स्वीकारतो; यत्-जे; माम्—मला; वदसि-तुम्ही सांगता; केशव-हे कृष्ण; न-कधीच नाही; हि-निश्चितच; ते-तुमच्या; भगवन्-हे भगवन; व्यक्तिम्-व्यक्तित्व; विदुः-जाणू शकतो; देवाः—देवता; न—तसेच नाही; दानवाः-दानव.

भाषांतर

हे कृष्ण! तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवन! देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत.

तात्पर्य

अर्जुन या ठिकाणी निक्षून सांगतो की, श्रद्धाहीन आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. सुरगणही जर त्यांना जाणू शकत नाहीत तर मग आधुनिक काळातील तथाकथित विद्वानांबद्दल काय सांगावे? भगवत्कृपेने अर्जुनाने जाणले आहे की, श्रीकृष्ण हेच परम सत्य आणि परिपूर्ण आहेत. म्हणून अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे. अर्जुनाला भगवद्गीतेचे प्रमाण प्राप्त झाले आहे. चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करण्याकरिता आवश्यक गुरुशिष्य परंपरा लुप्त झाली होती आणि म्हणून अर्जुनाद्वारे श्रीकृष्णांनी गुरुशिष्य परंपरेची पुनस्थापना केली, कारण अर्जुन हा त्यांचा जिवलग मित्र आणि एक महान भक्त होता. म्हणून गीतोपनिषदाच्या आमच्या ग्रंथप्रवेशामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवद्‌गीता ही परंपरेद्वारेच जाणणे आवश्यक आहे. जेव्हा परंपरा लुप्त झाली तेव्हा तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अर्जुनाला निवडण्यात आले. श्रीकृष्णांनी जे सांगितले त्या सर्वाचा अर्जुनाने स्वीकार केला आहे. या स्वीकृतीचे सर्वांनी अनुसरण केले पाहिजे. तरच आपण भगवद्गीतेचे सार जाणू शकतो आणि मगच श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्याचे आपण जाणू शकू.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com