वेदाबेस​

श्लोक 3 . 22

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।
नानवाप्त‍मवाप्त‍व्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥

शब्दार्थ

न-नाही; मे-माझे; पार्थ- हे पृथापुत्रा; अस्ति-आहे; कर्तव्यम्-कर्तव्य किंवा विहित कर्म; त्रिषु-तिन्ही; लोकेषु-लोकांमध्ये; किञ्चन- काहीसुद्धा; न-काहीच नाही; अनवाप्तम्-गरज आहे; अवाप्तव्यम्-प्राप्त करण्यालायक; वर्ते-मी करीत आहे; एव-निश्चितच; च-सुद्धा; कर्मणि- नियत कर्मामध्ये

भाषांतर

हे पार्थ! या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही, मला कशाची उणीव नाही तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो.

तात्पर्य

वेदांमध्ये श्रीभगवान यांचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे

tam īśvarāṇāṁ paramaṁ maheśvaraṁ
taṁ devatānāṁ paramaṁ ca daivatam
patiṁ patīnāṁ paramaṁ parastād
vidāma devaṁ bhuvaneśam īḍyam
 
na tasya kāryaṁ karaṇaṁ ca vidyate
na tat-samaś cābhyadhikaś ca dṛśyate
parāsya śaktir vividhaiva śrūyate
svābhāvikī jñāna-bala-kriyā ca

‘‘परमेश्‍वर हे इतर सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत आणि ते विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येकजण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंतांनीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत, जीव स्वत:हून श्रेष्ठ नाहीत. ते सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आहेत आणि ते सर्व नियत्यांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहेत. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारा पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहेत.

भगवंतांच्या शरीराचे स्वरुप सामान्य जीवासारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही. ते परिपूर्ण आहेत. त्यांची सर्व इंद्रिये दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियांपैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्याबरोबरचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमाप्रमाणे घडत जाते.’’ (शेताश्‍वतरोपनिषद् 6.7.-8)

भगवंतांमध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्‍वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्रीभगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही. जो मनुष्य कर्मफल घेण्यास बाध्य आहे. त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच, पण ज्याला तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करावयाचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते. तरीसुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत आहेत. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी हे शास्त्रनियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाहीत.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com